अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाल्याने एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे शेतकरी या संकटांना तोंड देताना आता पुरता हताश झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई सोबतच त्यांच्या पिकाला योग्य भाव देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    बुलडाणा : सतत होणारी नापिकी, अतिवृष्टीमुळे नष्ट होणारी काढणीला आलेली पीकं आणि डोक्यावर कायम असलेला कर्जाचा डोंगर. हे आता शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेल आहे. त्यात आता या परतीच्या पावसाने आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांची फक्त पीकंच नाही तर घरं सुध्दा वाहून गेली आहेत. नियतीच्या या जाचाला कंटाळून बुलडाणा जिल्ह्यात काल एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुलडाणा तालुक्यातील खूपगाव येथील सिद्धेश्वर जाधव या 45 वर्षीय शेतकऱ्यांकडे चार एकर शेती आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सिद्धेश्वर यांचे पूर्ण चार एकरातील सोयाबीन पीक नष्ट झाल्याने ते गेल्या तीन चार दिवसापासून चिंतेत पडले होते. त्यांच्याकडे एचडीएफसी बँकेचे जवळपास दीड लाख रुपयांचे आणि नवीन ट्रॅक्टरचे पाच ते सहा लाख रुपये त्याचे हप्ते बाकी होते.

    त्यामुळे कर्जाचे हप्ते कसे चुकते करायचे. या संपूर्ण विचाराने ते चिंतेत होते. त्यामुळेच त्यांनी 29 सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. असं सिद्धेश्वर यांच्या भावाने सांगितले. त्यांच्या मागे आई वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

    तर, दुसरीकडे याच गावातील शेतकरी संदीप लक्ष्मण नावकर यांनी देखील सततच्या नापिकी ला कंटाळून गळफास घेऊन काल आत्महत्या केली. संदीप यांचे वडील अपंग आहेत आणि आई देखील नेहमीच आजारी असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही संदीप वर होती. संदीप यांच्या वडिलांच्या नावावर जवळपास दोन एकर शेती आहे. या वेळेस अतिवृष्टी झाल्याने शेतातील सोयाबीन सडून नष्ट झाले, त्यांच्यावर देखील सेंट्रल बँकेचे कर्ज आहे. आई वडिलांच्या आजारपणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यातच सततची नापिकी या सर्वाला कंटाळून संदीप ने गळफास घेऊन आत्महत्या केली, संदीप यांच्या मागे आई, वडील, पत्नी एक सात वर्षाचा मुलगा आहे.

    बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे शेतकरी या संकटांना तोंड देताना आता पुरता हताश झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई सोबतच त्यांच्या पिकाला योग्य भाव देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.