या वीजकेंद्राजवळील परिसरात या पूर्वीही अशा घटना घडल्याने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी मुंबई ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर : वीज निर्मीती केंद्रातील कुणाल एंटरप्राइजेस या कंत्राटी कंपनीत कार्यरत कामगाराला वाघाने ठार केल्याची घटना समोर आली आहे. या परिसरातून रात्री १०.४५ च्या सुमारास भोजराज मेश्राम याला वाघाने उचलून नेल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघ फिरत आहे. याबाबत २ दिवसांपूर्वी वीज केंद्राने वनविभागाला माहिती दिली होती. त्यावर काही कारवाई होण्याआधीच ही घटना घडली आहे. चंद्रपूर वीज केंद्र परिसरातील ही घटना आहे. भोजराज मेश्राम (वय ५८) असे मृत कामगाराचे नाव असून ते वैद्यनगर, तुकूम येथील रहिवासी आहे. ते बुधवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान आपले काम आटोपून सायकलने घरी परतत होते. ते सीटीपीएस मधील कुणाल एंटरप्राइसेस मध्ये कामाला होते. घरी परततांना, रस्त्यात वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला व त्यांना उचलून नेले. त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाला. तर, त्यांची सायकल रस्त्यावर पडून होती.
वाघाचा हा हल्ला फारच भयानक होता. त्यामुळे, त्यांनी आपले प्राण गमाविले आहे. तर, वाघाने त्यांच डोकं धडापासून वेगळ केलं आहे. या वीजकेंद्राजवळील परिसरात या पूर्वीही अशा घटना घडल्याने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी मुंबई ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्याकडे केली आहे. तर,या संदर्भात १९ फ्रेब्रुवारीला बैठक घेण्यात येणार आहे.