
सध्या बाजारातून फेरफटका मारल्यास विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. बहुतांशी दुकानांतून सॅनिटायझर केव्हाच इतिहासजमा झाले आहेत. सोशल डिस्टन्स हा शब्दच इतिहासजमा झाला आहे.
गोंदिया : कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्याने राज्यातील चौदाहून अधिक जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आठवडी बाजार, मंदिरे सर्वच ठिकाणी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाचा भान राहिलेला नसून नागरिकांच्या तोंडावरचा मास्क आणि सॅनिटायझर बहुतांशी हद्दपार झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. हे सकारात्मक चित्र आहे. ज्यावेळी रुग्ण संख्या अधिक होती, तेव्हाही आचारसंहितेकडे दुर्लक्षच करण्यात येत होते. आता तर निर्बंध शिथिल केल्यामुळे बहुतांशी नागरिकांची कसेही वागले तरी चालते, अशी मनस्थिती झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे लसीकरणात आघाडी घेतली असल्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात कमालीची घट झाली आहे. असे असले तरी प्रशासनाने आचारसंहितेचे पालन न करणाऱ्या बेजबाबदार वागणाऱ्यांवर दंडाची कारवाई करणे गरजेचे आहे.
सध्या बाजारातून फेरफटका मारल्यास विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. बहुतांशी दुकानांतून सॅनिटायझर केव्हाच इतिहासजमा झाले आहेत. सोशल डिस्टन्स हा शब्दच इतिहासजमा झाला आहे. प्रशासन केवळ कागदोपत्री आचारसंहितेची बंधने घालत असल्यामुळे आपण निष्काळजीपणे वागलो तरी काहीही बिघडत नाही, अशीच मानसिकता बेजबाबदार नागरिकांची निर्माण होत आहे. जिल्ह्यात मागील महिन्यापासून रुग्णसंख्येत घट झाली आहे. परजिल्ह्यातील रुग्णसंख्या देखील शून्यावर आली आहे.