नाना पटोले म्हणाले, ‘आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही’, महाविकास आघाडीत पडणार वादाची ठिणगी

आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई (mumbai) वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा (3 wards in the Municipal Corporation) निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    नागपूर (Nagpur) : आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई (mumbai) वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा (3 wards in the Municipal Corporation) निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकशाही पद्धतीने जाऊन विरोध करू’ असं म्हणत आंदोलनाचा इशारा आहे. तसंच याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (cm uddhav thackery) बोलणार नाही, असंही पटोलेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्ह आहे.

    महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार केले जातील, असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. परंतु, महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत, यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    ‘आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधीच्या भावना मांडलेल्या होत्या. महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भावना मांडल्या होत्या आणि त्या आधारे दोन सदस्यीय प्रभाग सदस्य करावे, असं सरकारला कळवलं होतं. आता सरकारने जे निर्णय घेतलेला आहे, त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने लोकांसमोर जाऊन विरोध करू, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.

    तसंच, ‘आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळे असतात. आम्ही संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करू, असंही पटोले म्हणाले.

    आमचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे जे काही रिपोर्ट देतील त्याप्रमाणे आशिष देशमुख प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आशिष देशमुख यांच्या वक्तव्यात संदर्भात काही माहिती समोर आली आहे. आता प्रभारीच्या अहवालानंतर निर्णय होईल, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं.

    ‘विदर्भात सर्वत्र फिरताना परिस्थिती पाहिली आहे. मराठवाड्याची माहिती घेतली आहे. सोयाबीन आणि कापूसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. निर्माण झालेली परिस्थिती ओला दुष्काळ झाल्याकडे संकेत देत आहेत. सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करावी ही काँग्रेसची मागणी आहे, असंही पटोले म्हणाले. त्यामुळे प्रभाग रचनेच्या बदलावरून आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.