“आधी समजावुन सांगा, ऐकले नाही तर कानाखाली दोन ठेवून दया” –  रविकांत तुपकर

थकीत वीजबिलामुळे महावितरणाकडून ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहेत. यामुळे, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. या विषयीच्या वाढत्या तक्रारी पाहता 'गावात महावितरणचे कर्मचारी वीज कट करायला आल्यास त्यांना आधी समजावून सांगा आणि नाहीच ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा' असे आक्रमक आणि चिथावणीखोर विधान तुपकरांनी केले होते.

    वाशिम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वाशीम जिल्हा दौऱ्यावर असतांना पदाधिकारी मेळाव्यात तसेच प्रसार माध्यमांसमोर बोलताना ‘गावात वीज कापायला आलेल्या कर्मचाऱ्यांना आधी समजावून सांगा आणि नाही ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा’ असे आक्रमक विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून नाशिकमध्ये तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या या वक्तव्या विरोधात राज्यात इतरही ठिकाणी तक्रारी दाखल केल्या जाणार असल्याचे विज कर्मचारी संघटनेकडून बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात आता महावितरण विरुध्द ‘स्वाभिमानी’ असा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    रविकांत तुपकर हे आक्रमक नेतृत्व आणि वक्तृत्व म्हणून परिचीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुपकर नेहमीच आक्रमक भूमिका मांडतात. दरम्यान गेल्या आठवड्यात ते वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि प्रसार माध्यमांसमोर बोलतांना त्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांबाबत आक्रमक विधान केले होते.

    थकीत वीजबिलामुळे महावितरणाकडून ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहेत. यामुळे, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. या विषयीच्या वाढत्या तक्रारी पाहता ‘गावात महावितरणचे कर्मचारी वीज कट करायला आल्यास त्यांना आधी समजावून सांगा आणि नाहीच ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा’ असे आक्रमक आणि चिथावणीखोर विधान तुपकरांनी केले होते.

    तुपकर त्यांच्या या विधानाचे आता राज्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. उपनगर पोलिस स्टेशन नाशिकरोड येथे महाराष्ट्र राज्य विज वर्कस फेड्रेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. तुपकरांच्या चितावणीखोर वक्तव्यामुळे काही समाजकंटक महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याची दाट शक्यता असल्याने वीज कर्मचारी आणि अभियंत्यांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.