कॉलेजमध्येच एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला वार करून संपवलं, मारेकरी अनोळखी

डॉ. अशोक पाल हा एमबीबीएसमध्ये तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी महाविद्यालय परिसरातून डॉ. पाल जात असताना अनोळखी मारेकऱ्यांनी वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले.

    यवतमाळ (Yavatmal) : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्ह्यांच्या प्रकारांमध्ये भयानक वाढ झाली आहे. यवतमाळमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १०) रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अशोक पाल असे मृत शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्याचे नाव आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. अशोक पाल हा एमबीबीएसमध्ये तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी महाविद्यालय परिसरातून डॉ. पाल जात असताना अनोळखी मारेकऱ्यांनी वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील नागरिकांसह डॉक्टरांनी धाव घेऊन रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान डॉ. पालचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, शहर ठाणेदार नंदकिशोर पंत, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पोलिस कर्मचारी अन्सार बेग, बबलू चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

    यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली. मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी रुग्णालय परिसरात अद्यापही विद्यार्थी आक्रमक आहेत. दरम्यान, ही हत्या का करण्यात आली? मारेकरी अनोळखी होते तर खून का झाला? याचा पोलीस शोध घेत असून घटनेशी संबंधित सगळ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.