भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार म्हाडा इमारतींचा ताबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा इशारा

खाजगी विकासकाने ग्रामपंचायत किंवा इतर कोणतीही परवानगी न घेता इमारतीचा बांधल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून ही जागा गावच्या विकासासाठी, शाळा बांधण्यासाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी वापरण्याची ग्रामस्थांची मागणी होती.

    कल्याण : महाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी राखीव ठवेलेल्या गायरान जमिनीवर म्हाडाने इमारती उभारल्या असून गावच्या आरक्षित जागेवर बांधलेल्या इमारतींचा ताबा ७ नोव्हेंबर रोजी भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार असल्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांनी दिला आहे.

    भंडार्ली गोठेघर गावच्या व रजिया मार्केट या आरक्षित जागेवर म्हाडा तर्फे खाजगी विकासकाने ग्रामपंचायत किंवा इतर कोणतीही परवानगी न घेता इमारतीचा बांधल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून ही जागा गावच्या विकासासाठी, शाळा बांधण्यासाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी वापरण्याची ग्रामस्थांची मागणी होती. अनेक मोर्चे आंदोलने करून सुद्धा ही जागा मिळत नसल्याने या ग्रामस्थांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला.

    ग्रामस्थांना न्याय मिळावा म्हणून उच्च न्यायालयाने सन २०११ साली आदेश पारित केला असून या आदेशाचे अनुसरुण करून दिनांक १०/१०/२०२३ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी नागरिकांना न्याय द्यावा या कामी प्रांत अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना परिपत्रक काढून आदेश दिलेला आहे. तसेच ६/९/२०२३ रोजी प्रांत अधिकारी यांनी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी हे ग्रामस्थ म्हाडाच्या इमारतींचा ताबा घेणार असल्याची माहिती नरसिंग गायसमुद्रे यांनी दिली.