मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटाला जबाबदार कोण?

Who is responsible for Gas Cylinder Explosion

    पिंपरी (अमोल येलमार) : वेळ रात्री पावणेबाराच्या सुमारची…वाहता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग…सर्व्हिस रस्त्याने घराकडे जाण्याची गडबड करणारे नागरिक…आजूबाजूला असणारे ‘जीएसपीएम’ महाविद्यालयातील शांतता…शेजारील सोसायटीमध्ये झोपण्याची सुरू असलेली तयारी….

    गॅस सिलेंडर स्फोटाला जबाबदार कोण? 

    यातच हवेत आगीचे आणि धुराचे लोट…स्फोटाचे आवाज…यामुळे परिसरातील प्रचंड भीतीचे वातावरण. हिपरस्थिती काल रात्री होती ताथवडे परिसरात. या गॅस सिलेंडर स्फोटाला जबाबदार कोण? असा प्रश्न आता समोर येत आहे.

    सिलेंडरमध्ये भरण्याचा गोरख धंदा सुरु

    जीएसपीएम महाविद्यालयाच्या शेजारी असणाऱ्या सपकाळ यांच्या मोकळ्या जागेत कॅप्सूल गॅस टँकरमधून गँस चोरी करून तो सिलेंडरमध्ये भरण्याचा गोरख धंदा सुरु होता. हा धंदा सुरु असताना अचानक स्फोट झाला. सलग तीन ते चार स्फोट झाल्याने परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक प्रचंड घाबरले. स्फोटामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट उठले. यात बुलेट, टेम्पो सह दोन स्कूल बस जळूनखाक झाल्या. घटनास्थळी अग्ग्निशामक दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले.

    गोरखधंद्याला कोणाचा आशीर्वाद

    भरवस्तीत मोकळ्या जागेत सुरू असलेल्या या गोरखधंद्याला कोणाचा आशीर्वाद होता. कॅप्सूल या टँकर मध्ये मोठ्या प्रमाणात गँसहोता. चुकून याला आग लागली असती तर आजूबाजूच्या सोसायट्या आणि जीएसपीएम महाविद्यालयातील हॉस्टेल मध्ये राहणारेविद्यार्थी यांना धोका पोहचला असता. महामार्गावर वाहतूक कायम सुरु असते त्यांनाही धोका निर्माण झाला असता.

    तिघांना ताब्यात घेतले

    वाकड पोलिसांनी या प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. मात्र या स्फोटामागे फक्त हेचारजणच आहेत का?, या मागे आणखी काही लिंक आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. मोकळ्या जागेत सुरु असलेल्या यागोरख धंद्याकडे कोणाचेच कसे लक्ष गेले नाही? हा मोठा प्रश्न आहे.

    शहरात इतर ठिकाणीही ‘गॅस’चा काळाबाजार …

    पिंपरीचिंचवड शहरात इतर ठिकाणीही मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून विक्री करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये इतर राज्यातील तरुणांचा सहभाग मोठा आहे. याकडेही प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा मोठा अनर्थ घडणार यात शंका नाही.