
दिभना जंगल परिसरालगतच्या शेतात आलेल्या रानटी हत्तींना (Elephant Attack) जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याचा हत्तीच्या पायाखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.17) घडली.
गडचिरोली : दिभना जंगल परिसरालगतच्या शेतात आलेल्या रानटी हत्तींना (Elephant Attack) जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याचा हत्तीच्या पायाखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.17) घडली. होमाजी गुरनुले (वय 55, रा. दिभना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हत्तींच्या या हल्ल्यात एकजण जीव वाचविण्यात यशस्वी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
दिभनापासून 2 किमी अंतरावरील शेतशिवारात रानटी हत्ती आल्याची माहिती दिभना गावात मिळाली. त्यानुसार, होमाजी गुरनुले हे अन्य एका शेतकऱ्यासोबत आपल्या शेतात रात्री 8 वाजताच्या सुमारास पीक संरक्षणार्थ व कळपाला जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी गेले होते. रानटी हत्तींना शेतातून जंगलाच्या दिशेने वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, शेतात सर्वत्र हत्ती पसरले होते. कळपातीलच एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी एका झाडाचा आडोसा घेतला. परंतु, चवताळलेल्या हत्तीने होमाजी यांना सोंडेने उचलून जागीच आपटले व त्यानंतर पायाखाली चिरडले.
यात होमाजी गुरनुले हे जागीच ठार झाले तर सोबतचा शेतकरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. या भागात गेल्या आठवडाभरापासून रानटी हत्ती ठाण मांडून आहेत. मात्र वन विभागाने सतर्कता बाळगली नाही. शेतकरीच हत्तींना जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेले होते. त्यात एकाला जीव गमवावा लागल्याने वनविभागाच्या कारभारावर रोष व्यक्त होत आहे. सद्यस्थिती रानटी हत्तींचे कळप गिलगाव, अमिर्झा, मुरमाडी या जंगल परिसरात दाखल झाले आहेत.