महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालणार; लोकसभा अध्यक्षांनी केले आश्वासित

काही विधीमंडळाचे विषय होते जे लोकसभा आणि विधीमंडळाच्या कार्यक्रमाशी संबंधित असून त्याबद्दल मी ओमप्रकाश बिर्ला यांच्याशी चर्चा केली. त्याठिकाणी बिर्लांचे मुख्यमंत्र्यांसोबतही बोलणे चालले होते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले आणि त्यांनी येऊन पुष्पगुच्छ दिला. एकनाथ शिंदे तिथे होते ही वस्तूस्थिती आहे. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली आणि मला करायचीही नव्हती, असे नीलम गोऱ्हेंनी सांगितले.

    मुंबई – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) भेट झाल्याचे समोर येत आहे. गोऱ्हे आणि शिंदें यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याचे मान्य केले.

    मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ही भेट नेमकी कोणत्या पद्धतीची होती, असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांना विचारला. त्यावर गोऱ्हे यांनी पहिल्याच वाक्यामध्ये या भेटीचे उलट-सुलट अर्थ काढण्याची गरज नाही असे अधोरेखित केले. मुळात तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती वेगळ्या स्वरुपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांच्या भेटीसाठी गेले होते. ते सध्या मुंबईत आहेत. तसेच, मी जेव्हा तिथे गेले तेव्हा १० व्या मजल्यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर लोक त्यांच्यापाशीच बसलेले होते, असा खुलासाही नीलम गोऱ्हेंनी केला.

    ओम प्रकाश बिर्लां यांच्याकडे मला निवेदन द्यायचे होते, शुभेच्छा द्यायच्या होत्या. तसेच काही विधीमंडळाचे विषय होते जे लोकसभा आणि विधीमंडळाच्या कार्यक्रमाशी संबंधित असून त्याबद्दल मी ओमप्रकाश बिर्ला यांच्याशी चर्चा केली. त्याठिकाणी बिर्लांचे मुख्यमंत्र्यांसोबतही बोलणे चालले होते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आले आणि त्यांनी येऊन पुष्पगुच्छ दिला. एकनाथ शिंदे तिथे होते ही वस्तूस्थिती आहे. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली आणि मला करायचीही नव्हती, असे नीलम गोऱ्हेंनी सांगितले.

    श्रद्धा वालकर प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून मदत हवी
    जे निवेदन झाले त्या निवेदनाच्या आधारे बातमी पण मी दिलेली आहे. पुरातत्व विभागाने अजून सक्रीय काम करायला पाहिजे, श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील नेमले गेले पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या मी केल्या होत्या, ज्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्याकडून मदत हवी होती. या सगळ्या मुद्द्यावर बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही म्हणजेच महाराष्ट्र सरकारसुद्धा त्यामध्ये निश्चितपणाने पाऊल उचलेल. कठोर कारवाई करु असे ते म्हणाले, असेही नीलम गोऱ्हेंनी सांगितले.