
मुंबई : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नवरात्रोत्सवात सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या उत्साहाच्या भरात गरबा खेळताना मुलुंड मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह इथे भाजपतर्फे (BJP) आयोजित प्रेरणा रासमध्ये गरबा खेळत असताना शनिवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री एका तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं असून तो अवघा २७ वर्षांचा होता. डोंबिवलीचा रहिवासी असणाऱ्या ऋषभने एमबीएचे शिक्षण घेतले होते. बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ नोकरी करीत होता. डोंबिवली पश्चिममध्ये तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. घरातला एकटा कमवणारा तरुण मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
नवरात्रोत्सवात इतरांप्रमाणे तो देखील कुटुंबियांसोबत मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात भाजप नेते मनोज कोटक आयोजित गरबा खेळण्यासाठी आला होता. परंतु गरबा खेळत असतानाच त्याच्या छातीत दुखू लागले. अॅसिडिटी झाल्याचं समजून कुटुंबियांनी त्याला थंड पेय पिण्यास दिले. परंतु तरीही वेदना काही कमी न झाल्याने उपस्थितांच्या मदतीने त्याला तातडीने मुलुंडच्या आदिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. ऋषभच्या मृत्यूनंतर तरुणांमधील हृदविकाराच्या झटक्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहेत.