मुंबईतील ७ विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट; तीन दिवसांत प्रत्येकी एक हजारावर नवीन रुग्ण

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून रोजची रुग्णसंख्या १० हजारावर गेली आहे. यात अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर, वांद्रे, मुलुंड, मालाड या सात विभागातील रुग्णसंख्या तीन दिवसांत प्रत्येकी एक ते दोन हजारावर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. तर चेंबूर, कांदिवली, वांद्रे, अंधेरी येथील रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक कमी म्हणजे ३२ दिवसांवर घसरला आहे.

    मुंबई : मुंबईतील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून रोजची रुग्णसंख्या १० हजारावर गेली आहे. यात अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर, वांद्रे, मुलुंड, मालाड या सात विभागातील रुग्णसंख्या तीन दिवसांत प्रत्येकी एक ते दोन हजारावर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. तर चेंबूर, कांदिवली, वांद्रे, अंधेरी येथील रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक कमी म्हणजे ३२ दिवसांवर घसरला आहे.

    मुंबईत मागील वर्षीच्या मार्च महिन्यांत शिरकाव केलेल्य़ा कोरोना संसर्गा विरोधात अद्याप लढा सुरु आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. रोज आढळणा-या रुग्णांची संख्या १० हजारावर पोहचली आहे. यात मुंबईतल्या काही विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. मुंबईतील सात विभागात ४ एप्रिल ते ६ एप्रिलपर्यंत अवघ्या तीन दिवसांत १ हजार ते २ हजारावर नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

    झोपडपट्टी, चाळींपेक्षा इमारतीत सर्वाधिक ८० टक्के रुग्ण सापडत आहेत. पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणा-य़ा सोसायट्या मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित केल्या जात असून उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणार्‍यांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे, बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी, जीवनावश्यक वस्तू सोसायटीच्या गेटवर स्वीकारणे, पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती प्रशासनाला द्यावी अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे नियम मोडणा-या सोसायट्या व संबंधित व्यक्तींवर कड़क कारवाई केली जाणार आहे.

    सर्वाधिक रुग्ण असणा-या विभागांवर पालिकेने अधिक लक्ष वेधून तेथे नियमाची कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तातडीने शोध घेऊन संबंधितांना क्वारंटाईन केले जाते आहे. खाटांची संख्या, ऑक्सिजन, वेंटिलेटर आदीची पुरेसा उपलब्धता करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    या विभागात सर्वाधिक रुग्ण
    अंधेरी (प) – २,२५३
    कांदिवली – २,०१०
    गोरेगाव – १,६०५
    वांद्रे – १,३३३
    घाटकोपर – १,५३६
    मालाड – १,७५०
    मुलुंड – १,३७९