९ वी, ११ वीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार; शिक्षण विभागाचा निर्णय, फक्त मुख्यमंत्र्यांचा होकार येणं बाकी

इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. दरम्यान याची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शालेय परीक्षांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना पास करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता. पण इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेतली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. पण या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

    इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. दरम्यान याची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता लेखी परीक्षा घेणं योग्य ठरणार नसल्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न घेता त्यांना पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे.

    इयत्ता १० आणि १२ वीची परीक्षा ऑफलाईनच होणार

    दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचं काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून याआधीच जाहीर करण्यात आलं आहे. तसं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. पण वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता इयत्ता १० आणि १२ वीची परीक्षा ऑनलाइन घेण्यासंदर्भात विचार सरकार करत असल्याची चर्चा सुरू होती. पण राज्यातील ग्रामीण भागातून यास विरोध झाला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच पण वेळापत्रकात थोडा बदल करुन घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.