अण्णा हजारे यांचे केंद्रसरकारला पत्र; सरकारच्या वागण्यावर घेतली शंका

आंदोलनासाठी रामलीला मैदान व्यवस्थापनाला अनेक पत्र पाठवूनही उत्तर दिले जात नाही. यावरून सरकार सूडबुद्धीने वागत असल्याची शंका येत असल्याचे अण्णांनी पत्रात उद्वेगपणे स्पष्ट केले आहे.

मुंबई. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (annan hajare)यांनी गुरुवारी १४ जानेवारीला एक लेखी पत्र पाठवून आपण आपल्या कृषी मागण्यांसाठी आग्रही असल्यामुळे आपले सरकार माझ्याशी सूडबुद्धीने वागतेय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकार, कृषि मंत्र्यांना चार-पाच पत्र पाठवून साधे उत्तर पण मिळत नाही, आता माझ्या जानेवारीमधील नियोजित उपोषण आंदोलनासाठी रामलीला मैदान व्यवस्थापनाला अनेक पत्र पाठवूनही उत्तर दिले जात नाही. यावरून सरकार सूडबुद्धीने वागत असल्याची शंका येत असल्याचे अण्णांनी पत्रात उद्वेगपणे स्पष्ट केले आहे.

अनेक पत्र पाठवली पण उत्तर देण्याचे सौजन्यही नाही

अण्णांनी २९ मार्च २०१८ मध्ये दिल्लीत सात दिवस उपोषण केले होते. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने तत्कालीन कृषि राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या दिवशी भेट घेत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करताना शिफारशीनुसार सी टू फिफ्टीप्रमाणे एमएसपी देण्याचे लेखी दिले होते. तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय भाषणात आयोगाच्या शिफारशींचा उल्लेख करत त्याचे अनुपालन केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मला दिलेले आश्वासन आणि संसदेत शिफारशी मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याबाबत सरकारशी अनेकदा पत्रव्यवहार करून स्मरण पत्र पाठवली, मात्र सरकार या पत्रांना उत्तर देण्याचे पण सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे आपण आपल्या जानेवारीत आंदोलनावर ठाम असून सरकारने याची दखल घ्यावी, असे अण्णांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

तेव्हा संसदेत माझे तोंडभरून कौतुक केले मग आता काय झाले

अण्णांनी आपल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. आपण काँग्रेस सरकार असताना लोकपालसाठी २०११ मध्ये तेरा दिवस आंदोलन केले. त्यावेळी व नंतर दोन वेळेस संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यावेळी आपण आणि आपले सहकारी संसदेत माझे तोंडभरून कौतुक करत होते. मात्र, आता तुमचे सरकार आल्यानंतर मला लेखी आश्वासन देऊन आता आपण ते पाळत तर नाहीच तर त्याबाबत पाठवलेल्या पत्रांना साधे उत्तरही देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत, असे अण्णांनी म्हटले आहे.