एनओसी रद्द करण्याअगोदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुठे जायचे याचा खुलासा शिक्षणमंत्र्यानी करावा; भाजप नेते अतुल भातखळकर यांची मागणी

शाळांच्या शुल्कवाढी विरोधात तक्रार करण्यासाठी असलेल्या विभागीय शुल्क समित्या जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या दणक्याची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारने शाळांच्या कारवाईचा थापेबाजपणा बंद करावा. या शाळांचा एनओसी रद्द करण्याअगोदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुठे जायचे याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यानी केली  आहे.

    मुंबई : शाळांच्या शुल्कवाढी विरोधात तक्रार करण्यासाठी असलेल्या विभागीय शुल्क समित्या जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या दणक्याची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारने शाळांच्या कारवाईचा थापेबाजपणा बंद करावा. या शाळांचा एनओसी रद्द करण्याअगोदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुठे जायचे याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यानी केली  आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून फी मध्ये सवलत मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले.

    शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा

    त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या सुरुवातीपासून मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करून सुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम ‘शिक्षणसम्राट-धार्जिणे’ महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीका आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.

    फी मध्ये ५० टक्के सवलतीचा दिलासा द्या

    कोरोनाच्या काळात भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फी करिता तगादा लावणार्‍या व फी अदा न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरणार्‍या मुंबई-नवी मुंबईतील आठ शाळांची एनओसी रद्द करण्याचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय निव्वळ धूळफेक व पालकांची फसवणूक असल्याची टीका भातखळकर यानी केली आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनी कायद्यात सुधारणा करून फी मध्ये ५० टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.