गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाही. या पूर्वी या देशात असे कधीच झाले नव्हते. देशात नुसता हाहाकार माजला आहे. याच मुद्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबई : गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाही. या पूर्वी या देशात असे कधीच झाले नव्हते. देशात नुसता हाहाकार माजला आहे. याच मुद्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
मोहन भागवत यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांच्या मताला देशात आजही महत्त्व आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेते वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिराइतकाच महत्त्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेला होती. देशात आज जे सगळे काही सुरू आहे त्यावर भागवत यांनी आपले मत व्यक्त करावे असे राऊत म्हणाले.
टुलकिट प्रकरणावरून देशभरात चर्चा सुरू आहे. पण सगळ्या समाजमाध्यमांचा वापर भाजपाने विरोधकांविरोधात केला आहे. प्रकरण त्यांच्यावर उलटल्यावर धाड टाका, याला, पकडा असे सगळे सुरू आहे. आम्हीदेखील मजा पाहत आहोत, असा टोला राऊत यांनी भाजपासह केंद्र सरकारला लगावला आहे.