
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरले पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येते, असा सल्ला दिला आहे.
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नव्या घरोब्याच्या शोधात असून त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गळ घालण्यास सुरूवात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरले पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येते, असा सल्ला दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला. महापालिका निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण, ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही, असे सांगतानाच राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरले पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळते, असे पाटील म्हणाले. मात्र त्यांनी मनसेबरोबरच्या युतीची शक्यता फेटाळून लावली. मनसेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात काल भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे पाटील म्हणाले.