मुख्यमंत्री साहेब आम्हांला पण काम करु द्या; लोकल प्रवासासाठी मुंबई डबेवाल्यांची मुख्यमंत्र्यांना साद

जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळं त्याची झळ प्रत्येकाला बसली आहे. परिणामी रोजगार बुडला, कंपन्यांना टाळे लागले. होत्याचे नव्हते झाले. कोरोना, टोळेबंदी, निर्बंध, नियमावली याला आता सामान्य माणूस पिचला आहे. जेव्हापासून मुंबईत टाळेबंदी लागली आहे, तेव्हापासून लोकल बंद असल्याने मुंबतील डबेवाल्यांचे जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम बंद आहे. यामुळे डबेवाल्यांचे अर्थचक्र थांबले आहे. स्वाभाविकपणे यामुळं मुंबईतील डबेवाल्यांचे जगणं मुश्किल होऊन बसले आहे.

    मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळं त्याची झळ प्रत्येकाला बसली आहे. परिणामी रोजगार बुडला, कंपन्यांना टाळे लागले. होत्याचे नव्हते झाले. कोरोना, टोळेबंदी, निर्बंध, नियमावली याला आता सामान्य माणूस पिचला आहे. जेव्हापासून मुंबईत टाळेबंदी लागली आहे, तेव्हापासून लोकल बंद असल्याने मुंबतील डबेवाल्यांचे जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम बंद आहे. यामुळे डबेवाल्यांचे अर्थचक्र थांबले आहे. स्वाभाविकपणे यामुळं मुंबईतील डबेवाल्यांचे जगणं मुश्किल होऊन बसले आहे.

    लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्संना डब्बेवाल्यांची भुरळ

    मुंबई डबेवाला १३० वर्षापासून मुंबईत घरच्या जेवणाचे, स्वादिष्ट आणि चविष्ट डबे शाळा व कार्यालयांमध्ये पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्स यांनी देखील घेतली होती. मुंबई डबेवाल्यांनी राजा प्रिन्स चार्ल्स यांना भुरळ पडल्यामुळे ते स्वत: डबेवाल्यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. कोरोना महामारीमुळे प्रथमच डबेवाल्यांच्या या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आता मागील दिड दोन वर्षापासून बंद असलेला व्यवयाय पुन्हा एकदा सुरळीत सुरु व्हावा, आणि आम्हाला सुद्धा काम करुन जगू द्यावे अशा मागणीला डबेवाला व्यवसायिकांकडून जोर धरु लागला आहे.

    उत्तम व्यवस्थापनासाठी मुंबईतील डबेवाली प्रसिद्ध

    आपल्या कामाची कार्यशैली, उत्तम व्यवस्थापन धोरणामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनी संपूर्ण जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच “जनसेवा ही ईश्वर सेवा” आहे. अनेक सामाजिक उपक्रम मुंबईच्या डब्बेवाल्यांनी याआधी राबवत सामाजिक बांधिलिकी जोपासली आहे. परंतु हाताला काम नसल्याने मुंबईतील डबेवाला आता हवालदिल झाला आहे. त्यामुळं सरकारने आमच्या लोकल प्रवासाच्या या निर्णयाचा सकारात्मक विचार करुन पुन्हा एकदा जनसेवा करण्याची संधी शासनाने डबेवाल्यांना द्यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी केली आहे.

    गड्या आपला गाव बरा…!

    मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा कोरोनामुळं देशात आणि मुंबईत टाळेबंदी करावी लागली होती. त्याआधी मुंबईत जवळपास साडे तीन ते चार हजार डबेवाल्यांची संख्या होती, परंतू हाताला रोजगार नाही म्हणून खाणार काय? आणि जगणार कसे? यामुळं बहुतांश डबेवाल्यांनी “गड्या आपला गाव बरा“ म्हणत गावची वाट धरली. व गावी काम करु लागले. तर, अनेक डबेवाल्यांनी हाताला जे मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करु लागले. आता सद्यस्थितीत फक्त मुंबईत ३०० ते ४०० डबेवाले आहेत, जे असे डबेवाले ज्यांना शक्य आहे असे फक्त सायकलवरुन डबे पोहचविण्याचे काम करत आहेत. अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे. मार्च २०२० पासून मुंबई डबेवाल्यांची शंभर टक्के सेवा बंद आहे, त्यामुळं लोकल प्रवासांची परवानगी देऊन, पुन्हा एकवेळ शासनाने डबेवाल्यांचा व्यवसाय सुरु करावा अशी मागणी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी केली आहे.