chinchpoklicha chintamani

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ उत्सव मंडळ चांदीच्या गणपतीची स्थापना(Silver Ganesh Of Chinchpoklicha Chintamani) करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचे ऑनलाईन दर्शन(Online Darshan) घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

    मुंबई: गिरणगावातील शतक महोत्सवात पदार्पण करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच ‘चिंचपोकळी चा चिंतामणी’. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’(Chinchpoklicha Chintamani) या उत्सव मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ उत्सव मंडळ चांदीच्या गणपतीची स्थापना(Silver Ganesh Of Chinchpoklicha Chintamani) करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचे ऑनलाईन दर्शन(Online Darshan) घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

    गणेशोत्सवाच्या काळात जमणाऱ्या लोकवर्गणीतील ४० टक्के निधी हा गणेशोत्सवासह,नवरात्रोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवावर खर्च होतो तर उर्वरित ६० टक्के निधी समाजकार्यासाठी वापरला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा पायंडा याच मंडळाने पाडला,पुढे तो अनेक मंडळांनी स्विकारला.

    चिंचपोकळीच्या चिंतामणीला २०११ मध्ये ‘मुंबईचा राजा’ या किताबाने गौरविण्यात आले. सलग दोन वर्षे नामवंत वृत्तपत्राच्या उत्कृष्ट मूर्तीचे पारितोषिक मंडळाला मिळाले आहे.यावर्षी मंडळ श्री उमेश सिताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली १०२व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

    फक्त गणेशोत्सव,नवरात्रोत्सव या धार्मिक उत्सवा पुरतेच मर्यादित न राहता मंडळाचे वाचनालय,सुसज्ज ग्रंथालय,संदर्भ ग्रंथालय,आरोग्य दवाखाना तसेच माफक दरात इंग्रजी किलबिल नर्सरी,गेली ४० वर्षे बाटलीबॉय कंपाऊंड बृहन्मुंबई महानगपालिकेच्या वतीने लहान मुलांना लस टोचणी असे विविध उपक्रम तसेच क्रीडा क्षेत्रातील मुलांना प्रोत्साहन म्हणून मागील ४ वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.असे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात.महाराष्ट्रावर कोणतीही आपत्ती उद्भवली कि मंडळाचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. नुकताच महाड-पोलादपूर,चिपळूण ला अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली व नागरिकांचे अतोनत हाल झाले.मंडळाच्या वतीने त्यांना जिवनावश्यक वस्तू,जिन्नस व अत्यावश्यक घरगुती साहित्य यांचे वाटप करण्यात आले.

    मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुद्धा गतवर्षी सारखेच जनआरोग्य वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून उपक्रमाची सुरूवात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्त मंडळाच्या वतीने १ ऑगस्ट २०२१ रोजी के ई एम रूग्णालय रक्तपेढी,परळ,मुंबई यांच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात एकूण ३०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.उत्सव कालावधीत कोरोना या महामारीशी लढण्याकरिता घ्यावयाची काळजी तसेच स्वच्छ परिसर सुंदर परिसर यावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच आरोग्य चिकित्सा शिबीर व कोरोना तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शहापूर येथील आदिवासी पाड्यातील शालेय शिक्षण घेत असलेली मुले तसेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या ५ ते १० वीच्या मुलां-मुलींना शालेय साहित्य तसेच बॅग वाटप करण्यात येणार आहे.

    या वर्षी नवीन १ फुटाची चांदीची मुर्ती बसवण्यात येणार असून कोरोनच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्व चिंतामणी भक्तांना ऑनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन केले असून मंडळ शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करून या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे कोणीही गर्दी करु नये असे आवाहन मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे.

    या वर्षी अध्यक्ष -उमेश नाईक, कार्याध्यक्ष-भालचंद्र परब, मानद सचिव – वासुदेव गजानन सावंत आणि कोषाध्यक्ष – अतुल केरकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची कार्यकारिणी सहाय्यक सदस्यांसह गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज झाली आहे.