…तर ३० वर्षांत मुंबईचा निम्म्याहून अधिक भाग जाईल पाण्याखाली

वातावरणात झपाट्याने होत असलेले बदल, विध्वंस करणारे चक्रीवादळ आणि हंगामाआधीच बरसणारा पाऊस लक्षात घेतला, तर २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली असेल, अशी भीती मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी व्यक्त केली.

    मुंबई : वातावरणात झपाट्याने होत असलेले बदल, विध्वंस करणारे चक्रीवादळ आणि हंगामाआधीच बरसणारा पाऊस लक्षात घेतला, तर २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली असेल, अशी भीती मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त आय. एस. चहल (Iqbal Chahal) यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्या दिवसांची वाट न पाहता आतापासूनच त्यापासून बचावाच्या उपाययोजना करण्याची गरज चहल यांनी व्यक्त केली.

    मुंबईचा पहिला वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केला. त्यावेळी आयुक्त बोलत होते. ते म्हणाले की, त्यांनी ८ मे २०२० मध्ये मुंबई महापालिकेचा कार्यभार सांभाळण्यास सुरुवात केली. ते आएएस अधिकारी झाल्यापासून गेल्या ३१ वर्षांच्या काळात कधीही मुंबईसह राज्याला धोका निर्माण करणारे चक्रीवादळ झाले नव्हते. मात्र, ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रिवादळाने रायगडला फार नुकसान पोहोचले आणि मुंबईतही त्याचे परिणाम झाले. तेव्हा लक्षात आले की १८९१ नंतर म्हणजे १२९ वर्षांनंतर मुंबईत पहिल्यांदाच चक्रीवादळ आले. त्यानंतर मागील १५ महिन्यात जवळपास ३ चक्रीवादळे आली.

    ६ ऑगस्ट २०२० रोजी चक्रिवादळासह झालेल्या पावसात मुंबई नरिमन पॉइंट, दक्षिण मुंबईमध्ये सुमारे सोडेपाच फूट पाणी जमा झाले. प्रतितास १२० किलोमीटर वागाचे वारे होते. तेव्हा मुंबईत जेएनपीटी, बॉम्बे स्टॉक एक्सजेंचे फार मोठे नुकसान झाले.

    पाऊसही लहरी

    खरे तर राज्यात ६ ते ७ जूनला हंगामी पाऊस सुरू होतो. मात्र यावेळी १७ मे रोजीच तौक्ते वादळाने मुंबईला झोडपले आणि २१७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाळी हंगामात महिन्याच्या सरासरीएवढा पाऊस दोन-चार दिवसातच कोसळत असल्याचे सांगून त्यांनी मे-जून-जुलै महिन्याचे उदाहरणच दिले.

    ७० टक्के भाग पाण्याखाली

    आयुक्त चहल म्हणाले की, १९९० पासून २०१० पर्यंत असे वाटायचे की वातावरणात बदल होत आहे. पण त्यावेळी काही उपाययोजना झाल्या नाहीत. पण आता संकट आपल्या दारावर येऊन ठेपले आहे. आताचा वातावरणातला बदल आणि पावसाचा लहरीपणा लक्षात घेतला तर २०५० मध्ये मुंबई महापालिकेच्या ए, बी, सी आणि डी या चार प्रभागांचा ७० टक्के भाग पाण्याखाली गेलेला असेल.

    कफ परेड, मंत्रालय, नरिमन पॉइंट हा भाग २५ टक्के पाण्याखाली गेलेला असेल. म्हणजे गायब झालेला असेल. तो धोका काही लांब नाही. तो धोका संभवू नये म्हणून आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुढची २५-३० वर्षे काही लांब नाहीत. त्यामुळे आताच आपण जागे झालो नाही, तर पुढची २५-३० वर्षे आपणाठी धोकादायक आहेत. याचे परिणाम पुढच्या पिढीला नव्हे, तर आताच्या पिढीला भोगावे लागणार आहेत, अशी भीतीही आयुक्तांनी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई वातावरण कृती आराखडा महत्त्वाचा आहे. दक्षिण आशिया खंडात मुंबई शहर हे असे एक शहर आहे की त्या शहराचा स्वतंत्र वातावरण कृती आराखडा तयार झाला आहे, असे आयुक्त म्हणाले.