देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती

कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असा सवाल करत फडणविस म्हणाले की, बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८० टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार आहे. फडणवीस यांनी शेवटी म्हटले आहे की, मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको.

मुंबई  : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या आवाहनाला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही.
पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा असे फडणवीस म्हणाले.

भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल का केली जात आहे? ३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी फडणवीस यांनी केली.

प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय चार वर्षांचा विलंब वेगळा असे फडणवीस म्हणाले.

कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असा सवाल करत फडणविस म्हणाले की, बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८० टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार आहे. फडणवीस यांनी शेवटी म्हटले आहे की, मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे असेही ते म्हणाले.