मुंबई: निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आज तातडीची मदत आवश्यक असल्याने पंचनामे पूर्ण होईस्तोवर तातडीची रोखीने मदत द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई: निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आज तातडीची मदत आवश्यक असल्याने पंचनामे पूर्ण होईस्तोवर तातडीची रोखीने मदत द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबई आणि कोकण विभागातील लोकप्रतिनिधींकडून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या चक्रीवादळाने कोकणात प्रचंड नुकसान झालेले असल्याने राज्य सरकारने तातडीने कोकणवासियांना मदत करण्याची गरज आहे. शेती, फळबागा, घरे, मासेमार, वृक्ष उन्मळून पडणे, जनावरांचे मृत्यू, पायाभूत सुविधांना क्षती असे मोठेच नुकसान या वादळाने झाले. वीज आणि दूरध्वनी सेवा अद्यापही खंडित आहेत. अशास्थितीत पंचमाने तर त्वरेने करावेच लागतील. पण, तोवर तातडीने आणि रोखीने मदत करण्याची नितांत गरज आहे. केवळ रायगड नाही, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या भागात सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी.