‘समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक’ असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्यातील जनतेला केले कळकळीचं आवाहन….

समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा

    राज्यात कोरोनाचे नव्याने रुग्ण वाढ्त आहेत. करोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणून सातत्यांने कार्यतत्पर राहात असलेले आरोग्यमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रावर पुन्हा करोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. अनेक शहरातील कोरोनाचा उद्रेक होताना दिसत असून, करोना विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाउन करण्याच्या विचारात आहे. मात्र, पुन्हा लॉकडाउनचं संकट ओढवून नये, यासाठी टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.

    राज्यात करोनाचं संकट पुन्हा बळावलं आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, आठ दिवसांत रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाउन लागू करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिले असून, पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


    “गेल्या वर्षभरापासून आपण करोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही करोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. करोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु करोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

    “समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने,” असं आवाहन टोपे यांनी महाराष्ट्राला केलं आहे.