बाळासाहेबांची आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे; अनिल परब यांचं स्पष्टीकरण

केंद्रीय यंत्रणा हाताशी घेऊन सचिन वाझेंकडून पत्रातून हे आरोप केलेले आहेत. आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

    मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रीया दिली आहे.

    परब म्हणाले की,“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं, असं अनिल परब म्हणाले.

    अनिल परब काय म्हणाले ?

    सरकारला बदनाम करण्यासाठीच भाजपने हे प्रकरण तयार केले आहे. कारण, सचिन वाझे आज कोर्टात पत्र देणार याची कल्पना कदाचित त्यांना आधीपासूनच असेल. म्हणूनच, ते आधीपासून याचा गाजावाजा करत होते. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा हाताशी घेऊन सचिन वाझेंकडून पत्रातून हे आरोप केलेले आहेत. आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.