मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का ?; नितेश राणेंचा सवाल

मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? असा सवाल करत, नितेश राणे यांनी ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर भाष्य केले.

    मुंबई : राज्या कोरोना रुग्णांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. त्यातही मुंबईत कमालीची घट दिसत असून देशभरात ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न नावाजला जात आहे. अशात हा मुंबई पॅटर्न निव्वळ खोटारडेपणा असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

    नितेश राणेंचा गंभीर आरोप

    नितेश राणे यांनी ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी म्हटले.

    दरम्यान कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असे नितेश राणे यांनी सांगितले आहे. आता नितेश राणे यांच्या आरोपाला शिवसेना आणि महाविकासआघाडीचे इतर नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.