मुंबई : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.
दरम्यान मुंबईत काल, गुरुवारी सकाळपासून थोड्या प्रमाणात पाऊस पडला. पण त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसह मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या वाशीतही जोरदार सरी बरसत आहे.