राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र पाठवण्याची शक्यता आहे. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी यासंदर्भात राज्यपाल यांना मुख्यमंत्री आज पाठवू शकतात.
मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) पार्श्वभूमीवर राज्यातील (Maharashtra) राजकारणात बऱ्याच हालचाली सुरु आहेत. आज ५ वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक (Meeting) होणार आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या चर्चेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र पाठवण्याची शक्यता आहे. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी यासंदर्भात राज्यपाल यांना मुख्यमंत्री आज पाठवू शकतात.
दरम्यान संग्राम थोपटे यांच्या नावावर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा कौल असल्याचं बोललं जात आहे. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध घडामोडी होताना दिसत आहेत. दुसरीकडे दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांच्या बैठका पार पडल्या. मंगळवारी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर आता बुधवारी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक पार पडली.