दडपशाहीपुढे मराठा झुकणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सरकारला ठणकावले

भाजपा सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला. तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा मोर्चाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली. पण आघाडी सरकारचा मराठा समाजाबद्दल एवढा राग आहे की, मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडणेसुद्धा त्यांना सहन होत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. सोलापूरमधील मोर्चा राजकीय नव्हता. तेथे कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता.

    मुंबई : सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चावर पोलिस बळाचा वापर करण्यात आला. या घटनेचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध नोंदवला आहे. सोलापूरच्या मोर्च्यात आघाडी सरकारने प्रचंड पोलिस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, अशा शब्दात पाटील यांनी आघाडी सरकारला ठणकावले आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक प्रेस नोट काढून हा निषेध व्यक्त केला आहे.

    …तर समाज पेटून उठेल

    सरकारने प्रचंड दडपशाही करूनही मराठा समाजातील आंदोलकांनी मोर्चा काढला, याबद्दल आंदोलकांचे अभिनंदन. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले. तरीही सरकार अशी दडपशाही करून मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावले.

    महाविकास आघाडीला समाजाबद्दल राग

    भाजपा सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला. तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा मोर्चाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली. पण आघाडी सरकारचा मराठा समाजाबद्दल एवढा राग आहे की, मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडणेसुद्धा त्यांना सहन होत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. सोलापूरमधील मोर्चा राजकीय नव्हता. तेथे कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता.

    भाजपाचे कार्यकर्तेही पक्षाचा झेंडा आणि बिल्ला बाजूला ठेवून सहभागी झाले होते. पण मराठा समाजाचे आरक्षण घालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला आता आवाजही दडपायचा आहे असे दिसते. पण त्यांचा हा हेतू सफल होणार नाही. ते जितकी दडपशाही करतील तितका मराठा समाजातील संताप उफाळेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असेही ते म्हणाले.