आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण

टिळक भवन येथे आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'इंग्रजांच्या काळापासून पारधी समाजाकडे एक गुन्हेगारी समाज म्हणून बघितले जात असे स्वातंत्र्यानंतर त्यात बदल  होत आहे, पंतप्रधान पंडित नेहरु, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेस सरकारने या समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. शासनाच्या योजनांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.'

    मुंबई : पारधी समाजाकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या समाजावर गुन्हेगारी समाज असा शिक्का मारला गेला आहे ती ओळख बदलून त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा वंचित, शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष असून राज्यातील आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार, राहण्याची सोय अशा सर्वांगिण विकासासाठी कट्टीबद्ध आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

    टिळक भवन येथे आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले ,त्यावेळी पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इंग्रजांच्या काळापासून पारधी समाजाकडे एक गुन्हेगारी समाज म्हणून बघितले जात असे स्वातंत्र्यानंतर त्यात बदल  होत आहे, पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेस सरकारने या समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. शासनाच्या योजनांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजही या समाजाचे काही प्रश्न, समस्या आहेत त्या मार्गी लावणे गरजेचे आहे त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक आयोजित करुन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करु.

    यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष मुकेश साळुंके, समाधान साळुंके, रा. ना. सोनावणे, बन्सीलाल पवार, अनिल चव्हाण, संतोष पवार, बसोराम चव्हाण, सुरेश सोनावणे, सचिन साळुंके, सुकदेव डाबेराव, अशोक चव्हाण, अनिल माळे, सुधाकर पारधी हे पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

    स्वतंत्र आदिवासी पारधी विकास मंडळाची स्थापना करणे, विधान परिषदेवर सदस्यत्व मिळावे, भूमिहिन बेघर आदिवासी पारधी समाजास शेत जमीन व घरकुल देऊन पुनर्वसन करावे. मुंबई, ठाण्यात फुटपाथ, सिग्नलवर, उड्डान पुलाखाली राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाचे ठाणे जिल्ह्यात राखीव क्षेत्रावर पुनर्वसन करावे. पारधी विकास आराखड्यासाठी पुरेसा निधी द्यावा, या मागण्यांचे निवेदन आप्पासाहेब साळुंके यांनी नाना पटोले यांना दिले.