मुंबईला भिकारी मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मोठी मोहिम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत भिकाऱ्यांची धरपकड सुरु आहे. भिकाऱ्यांना पकडून त्यांची चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोय करण्यात येत आहे. पकडण्यात येणाऱ्या भिकाऱ्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईला भिकारी मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मोठी मोहिम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत भिकाऱ्यांची धरपकड सुरु आहे. भिकाऱ्यांना पकडून त्यांची चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोय करण्यात येत आहे. पकडण्यात येणाऱ्या भिकाऱ्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.
मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून रस्त्यावर फिरणाऱ्या आणि भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेशच त्यांनी दिले आहेत.
भिकाऱ्यांना पकडण्याच्या मोहीमेला सुरुवात देखील झाली आहे. आझाद मैदान पोलीसांनी १४ भिकाऱ्यांना पकडून त्यांना भोईवाडा कोर्टात हजर केले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर चेंबूर येथील भिक्षेकरी स्विकार केंद्रात त्यांची सोय केली जाणार आहे.
कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुरू केलेली भिकाऱ्यांविरोधातील मोहित ही संपूर्ण फेब्रुवारी महिना घेतली जाणार आहे.
भिकाऱ्यांविरोधात मोहिम राबवण्याचे कारण काय?
मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा भिक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो. लहान मुलांच्या माध्यमातून सहानभुती मिळवून पैसे कमावणाऱ्यांची भिकाऱ्यांची टोळी मुंबईत कार्यकरत झाली आहे. अनेक लहान मुलांचं अपहरण करुन त्यांना भिक मागायला लावण्याचे प्रकारही घडतात. मुंबईच्या चौकाचौकात भिक मागण्याचा व्यवसायच बनला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याविरोधात आता धडक मोहीम सुरू केली असून फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांकडून विभागातील भिकाऱ्यांना पकडले जाणार आहे.