मुंबईतील पाणीकपात आजपासून रद्द, मुंबईकरांना मोठा दिलासा

ऑगस्ट (August) महिन्यापासून पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईतील सातही तलाव पाण्याने भरले. त्यामुळे २१ ऑगस्टला पाणीकपात ( Water Cut) १० टक्क्यांवर करण्यात आले. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत ९५ टक्के जलसाठा झाल्याने सध्या मुंबईत लागू केलेली १० टक्के पाणीकपातही मागे घेण्यात आली आहे.

मुंबई : जून (June) आणि जुलै (July) महिन्यात राज्यांत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईत (Mumbai)  २० टक्के पाणी कपात करण्यात आली होती. परंतु ऑगस्ट (August) महिन्यापासून पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईतील सातही तलाव पाण्याने भरले. त्यामुळे २१ ऑगस्टला पाणीकपात ( Water Cut) १० टक्क्यांवर करण्यात आले. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत ९५ टक्के जलसाठा झाल्याने सध्या मुंबईत लागू केलेली १० टक्के पाणीकपातही मागे घेण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठय़ात वाढ झाली आहे. सातही तलावांतील एकूण जलसाठा ९५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठाही नियमित केला जाणार आहे.