आता विमानतळाच्या मुख्यालयावरून मुंबईत राजकारण पेटले! सेना-मनसे सोबत कॉंग्रेसची ही प्रतिक्रिया!

गुजरातला मुख्यालय नेले म्हणून गरबा करत असतील तर विमानतळ मुंबईतच आहे आम्ही झिंगाट करून दाखवू शकतो.

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे मुख्यालय अदानी कंपनीने मुंबईतून अहमदाबादला हलवल्यानंतर त्यावर आता राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यानी म्हटले आहे की, हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरेच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेलें.
     
    आम्ही झिंगाट करून दाखवू
    तर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यानी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, गुजरातला मुख्यालय नेले म्हणून गरबा करत असतील तर विमानतळ मुंबईतच आहे आम्ही झिंगाट करून दाखवू शकतो.

    विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही
    सचिन सावंत यानी म्हटले आहे की, महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आप-परभाव केला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी जीविके या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. जीविकेने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही असे सावंत म्हणाले.