पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षाकवच, सुरक्षा जनतेला व महिलांना द्या, लोकप्रतिनिधीना कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही- चंद्रकांत पाटील

पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी -चंद्रकांत पाटील

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केल्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र “लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी,” असे उपरोधिक शैलीत  भाष्य करत या मुद्द्याला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न आहे. याबाबतचे व्टिट करताना पाटील यांनी म्हटले आहे की, “महाविकास आघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार!
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही,”
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, “आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलीस जवानंना वगळण्यात आले आहेत. त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, “पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट राहावी, याकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे.”
पाटील यांनी महटले आहे की, “पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी,” अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले