130 कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधान… नाना पटोले म्हणतात…

देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या महामारीवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 130 कोटी जनतेला रामभरोसे सोडून विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात. असा बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या 70 वर्षात देशाने पाहिला नाही, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर चढवला.

    मुंबई : देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या महामारीवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 130 कोटी जनतेला रामभरोसे सोडून विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात. असा बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या 70 वर्षात देशाने पाहिला नाही, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर चढवला.

    परदेशी प्रवाशांवर निर्बंध लावण्यात दिरंगाई

    कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमीत झाल्याने कोर्टाचे कामकाज ऑनलाईन घ्यावे लागत आहे. मागील वर्षी कोरोना महामारी आली तेव्हाही तातडीने पावले उचलण्याऐवजी नमस्ते ट्रम्पच्या कार्यक्रमात मोदी व्यस्त होते. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्यात वेळकाढूपणा केला. देशात कोरोनाचे दररोज दीड-पावणे दोन लाख रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचे आकडेही अंगावर शहारे आणणारे आहेत, असे पटोले म्हणाले.

    परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती

    जाहीरातीतून जनतेला कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः मात्र प्रचारसभांसह अनेक कार्यक्रमात मास्क घालत नाहीत, अशा पंतप्रधानांचा लोकांनी काय आदर्श घ्यावा. पश्चिम बंगाल, आसाम या राज्यातील कोरोना रुग्णही आता वेगाने वाढत आहेत. दररोज चार-पाच हजार लोकांना कोरोनाचे संक्रमण होत आहे. या राज्यातील रुग्णवाढीचा वेग दररोज झपाट्याने वाढत आहे. याच वेगाने रुग्ण वाढत राहिले तर या राज्यातील परिस्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असे पटोले म्हणाले.

    कोरोनाने देशात हातपाय पसरले. त्यानंतर अचानक चार तासांचा वेळ देत मोदींनी मनमानीपद्धतीने लॉकडाऊन लावून देशाला अराजकाच्या संकटात ढकलले. कसलाही विचार न करता लहरीपणाने निर्णय घेऊन देशाला वेठीस धरण्याचे काम केले. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले, लाखो बेरोजगार झाले. व्यापारी, दुकानदार, हातावरचे पोट असलेले कष्टकरी, कामगार यांचे प्रचंड हाल झाले. पण यातून मोदींनी कोणताच बोध घेतला नाही, असे म्हणत दिल्लीच्या तख्तावरून सात वर्षांपासून सुरु असलेल्या तुघलकी कारभारात देशाची जनता होरपळून निघत आहे.

    - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस