राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता

येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे.  दरम्यान मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबईत अनेक भागात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मुंबई : येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे.

    दरम्यान मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबईत अनेक भागात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचसोबत वाहतूक देखील धीम्या गतीनं मुंबईत होत असल्याचे चित्र आहे. मध्यरात्री देखील मुंबईत मुसळधार पाऊस अनुभवायाला मिळाला होता असाच काहीसा पाऊस आता देखील होत असल्याचे चित्र आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

    तसेचं पुढील 3 ते 4 तास मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. उद्यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हवामान विभागाकडून  रेड अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात साधारण 200 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद ही येत्या 24 तासात ह्या तिन्ही जिल्ह्यात बघायला मिळू शकते. मुंबई, ठाणे आणि पालघरचा विचार केला तर साधारण 19 ते 22 जुलै दरम्यान ह्या तिन्ही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असेल. ज्यात ह्या चार दिवसांच्या दरम्यान आपल्याला 100 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बघायला मिळू शकतो.  रायगड परिसरात देखील पुढील 3 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील अनेक भागात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. अशातच पुढील 3-4 तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगर खचल्याच्याही घटना बघायला मिळाल्या आहेत.