पाच दिवसांसाठी रेड, ऑरेंज अलर्ट; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात शनिवारपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने 23 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी 2,3 स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    मुंबई : राज्यात शनिवारपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने 23 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी 2,3 स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम असतानाच सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरले. पावसाची कोसळधार कायम राहिल्याने सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचले. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.

    मुंबईत कहर

    शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी 15 ते 20 मिनिटे लोकल सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली. यानंतर विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रूळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू होती. मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने मुंबई, उपनगरांसह लागून असलेल्या जिल्ह्यांत मुक्काम ठोकला आहे. संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.