महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या ‘पासवान’ यांना रोहित पवारांचे पत्र, खोचक शब्दात दिले उत्तर

जेव्हा २०१८मध्ये मुजफ्फरपूर येथील निवारागृहात लैंगिक मुलींचं शोषण करण्यात आलं होतं. त्यावेळी तुम्हीच म्हणाला होतात की, अशा घटना इतर जिल्ह्यातही घटल्याचं समोर येतंय. आपण नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली नाही.

मुंबई : शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकार्‍याला झालेली मारहाण आणि कंगना प्रकरणावरुन खासदार चिराग पासवान यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात रोहित पवारांनी पासवान यांना सणसणीत उत्तर दिले आहे. तर बिहारमधील गुन्हेगारीचा पाढाच लिहिला आहे.

काय लिहिले आहे रोहित पवारांनी पत्रात वाचा

चिराग पासवानजी नमस्कार, आपण महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंतेत असून, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत असल्याचं ऐकण्यात आलं. तुम्ही जर कायदा सुव्यस्थेचे इतकेच पुरस्कर्ते आहात, तर त्यावेळस बिहारमध्ये ही मागणी का केली नाही. जेव्हा २०१८मध्ये मुजफ्फरपूर येथील निवारागृहात लैंगिक मुलींचं शोषण करण्यात आलं होतं. त्यावेळी तुम्हीच म्हणाला होतात की, अशा घटना इतर जिल्ह्यातही घटल्याचं समोर येतंय. आपण नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली नाही.

इतकंच नाही, तर एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बिहारची राजधानी पाटणा ही खूनांच्या घटनांमध्ये देशातील १९ शहरांमध्ये पहिल्या क्रमाकांवर आहे. पाटण्यातील खूनांच्या घटनांची सरासरी ४.४ टक्के इतकी आहे. जी की दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या जयपूरपेक्षा (३.१ टक्के) खूप जास्त आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या मुलींच्या हत्यांमध्येही पाटणा पहिल्या क्रमांकावर आहे.

इतकंच नाही, तर २०१८मध्ये राजेंद्र सिंह यांच्यासारख्या ५ ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. अनेक पत्रकारांचे खून करण्यात आले. भूखंड माफियाकडून लोकांना मारणे, घरं जाळणं या सारख्या घटना बिहारमध्ये अगदी सर्रास घडतात. सर्वसामान्य माणसांची काय अवस्था असेल, हे यावरून दिसून येतं. मागील १५ वर्षात ६ सहापेक्षा जास्त अधिकाऱ्यांची गुन्हेगारांनी हत्या केली.

तरीही आपला पक्ष सत्ताधारी पक्षासोबत कसा काय सत्तेत आहे, याचंच आश्चर्य वाटत. चिरागजी, सुशांतच्या दुःखद मृत्यूचा वापर आपल्या राजकीय करिअरसाठी करणाऱ्या अभिनेत्रीच्या सूरात सूर मिसळून महाराष्ट्राविरोधात टीका करणं सोप्पं आहे. पण, बिहारमधील जर्जर झालेल्या प्रत्येक मूलभूत सुविधेची जबाबदारी घेऊन त्यात सुधारणा करणं अवघड आहे. दुःख याचंच वाटतंय की, आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी सोपा रस्ता निवडत आहात. सिनेसृष्टीतील करिअरच्या काळात आपणही मुंबईचं आपलेपण अनुभवलं असेल, फक्त राजकीय लाभासाठी आपण महाराष्ट्रावर चिखलफेक करत आहात, हे महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही. आपला, – रोहित राजेंद्र पवार, आमदार, महाराष्ट्र विधानसभा