एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाने तात्काळ निधी द्यावा- श्रीरंग बरगे यांची मागणी

महामंडळ आर्थिक संकटात सापडले असून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी महामंडळाकडे निधी उपलब्ध नाही. तसेच, त्यामध्ये अजून काही महिने फार मोठा फरक पडेल अशी परिस्थिती नाही . तरी एसटी वाहतूक पूर्ववत चालू होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने एसटी महामंडळाला अर्थसहाय्य करावे यासाठी सर्व संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी स्वतः प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

    मुंबई: मागील काही महिन्यापासून एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन आर्थिक अडचणीमुळे एसटी प्रशासन देऊ शकले नाही. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील सहा महिन्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदना द्वारे केली आहे.

    महामंडळातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन अदा केले जाते. मात्र मे २०२१ महिन्याचे वेतन ७ जून २०२१ रोजी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. एकिकड़े, एसटी कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी जर ठरलेल्या तारखेला पगार मिळाले नाही, तर त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. करोना प्रादुर्भावामुळे एसटी वाहतूक बंद असल्याने गेली सव्वा वर्ष महामंडळाला प्रवासी उत्पन्न मिळत नाही.
    महामंडळ आर्थिक संकटात सापडले असून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी महामंडळाकडे निधी उपलब्ध नाही. तसेच, त्यामध्ये अजून काही महिने फार मोठा फरक पडेल अशी परिस्थिती नाही . तरी एसटी वाहतूक पूर्ववत चालू होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने एसटी महामंडळाला अर्थसहाय्य करावे यासाठी सर्व संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी स्वतः प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मे २०२१ चे देय असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ देण्यासंदर्भातील उचित कारवाई शासनाकडून व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष गायकवाड हजर होते.