शाळेच्या रिक्त भूखंडाचा नागरिक डम्पिंग ग्राउंड म्हणून वापर करत असताना नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी या डम्पिंग ग्राउंडचे रुपडे पालटुन शाळेची उभारणी करून एक प्रकारे स्वर्ग निर्माण केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेली ही जुनी नगरसेवक मंडळी आहे. नागरिकांच्या हक्कासाठी व चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी कायम झटत असल्याचे त्यांनी सांगून महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामांचा त्यांनी यावेळी दाखला दिला.
मुंबई : समाजामध्ये आज ज्या व्यक्ती मोठया पदांवर काम करताना दिसत आहेत, त्यापैकी बहुतांश जणांचे शिक्षण हे महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालिकेच्या शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.
प्रभाग क्रमांक ११७ मधील स्थानिक नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या प्रयत्नाने विक्रोळी( पूर्व) येथील टागोर नगरच्या महानगरपालिकेच्या सीबीएसई मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण खासदार संजय राऊत यांच्या हस्ते तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शाळेच्या रिक्त भूखंडाचा नागरिक डम्पिंग ग्राउंड म्हणून वापर करत असताना नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी या डम्पिंग ग्राउंडचे रुपडे पालटुन शाळेची उभारणी करून एक प्रकारे स्वर्ग निर्माण केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेली ही जुनी नगरसेवक मंडळी आहे. नागरिकांच्या हक्कासाठी व चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी कायम झटत असल्याचे त्यांनी सांगून महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामांचा त्यांनी यावेळी दाखला दिला.
महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी हा जगातील कुठल्याही शाळेत कमी पडणार नाही,असा मला आत्मविश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळांचे लोकार्पण होत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर किशोरी पेडणेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ असून त्याची शैक्षणिक जडणघडण ही चांगली होण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेने सुरु केलेल्या सीबीएसई शाळा त्याचे एक उदाहरण असल्याचे महापौरांनी सांगितले.