जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) चांगला लोकप्रतिनिधी आणि मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा ( Pandharpur – Mangalwedha) विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) चांगला लोकप्रतिनिधी आणि मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, भारतनानांचं नेतृत्वं हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खाशी एकरुप झालेलं नेतृत्वं होतं. मतदार संघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलं.
सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा.

शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारं त्यांचं नेतृत्वं होतं. भारतनाना भालके यांचं अचानक निघून जाणं ही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी काँग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.