राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; ‘या’ मंत्र्याचा थेट इशारा

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी केलेल्या वक्तव्यावरून आता सत्ताधारी मंत्री संतापले असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे.

    मुंबई : राज्यावर आलेल्या अस्मानी संकटांचे सध्या राजकारण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी केलेल्या वक्तव्यावरून आता सत्ताधारी मंत्री संतापले असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे.

    काय म्हणाले शंभूराज देसाई?

    नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने एकेरी भाषेत बोलत आहेत, त्याला जशास तसे उत्तर देण्याची आणि त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे. मात्र, आम्ही सय्यमी आहोत आणि आम्हाला संयम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे. तसेचं ‘नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते.

    दरम्यान त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पद हे एक घटनात्मक पद आहे. त्या व्यक्तीबद्दल एकेरी भाषेत बोलणे, हे राणेंसारख्या व्यक्तींना शोभत नाही. आम्ही संयमी आहोत आणि आम्हाला सय्यम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. नाही तर त्यांना तशाच भाषेत उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची हिंमत आम्हा शिवसैनिकांत आहे. असंही ते म्हणाले.

    नारायण राणे काय म्हणाले होते?

    चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणेंचा तोल गेल्याचंही दिसलं.

    नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.” समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं.