या प्रकरणामुळे सरकार बिलकूल धोक्यात असण्याचे कारणच नाही. विधीमंडळात याबाबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलेली आहेत. या प्रकरणावरुन सरकारवर कोणताही धोका होण्याची शक्यता नाही असं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.
मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात एपीआय सचिन वाझेंना अटक झाली आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीच सापडले असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मात्र, सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही असं विधान गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाबेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला होता. असं असताना अचानकपणे केंद्रीय यंत्रणेकडे हा तपास देण्यात आला आहे. त्यांना जे योग्य वाटतंय, त्यांना जो काही तपास करायचा आहे तो तपास ते करतील अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
या प्रकरणामुळे सरकार बिलकूल धोक्यात असण्याचे कारणच नाही. विधीमंडळात याबाबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलेली आहेत. या प्रकरणावरुन सरकारवर कोणताही धोका होण्याची शक्यता नाही असही ते म्हणाले.
एखाद्या प्रकरणात एखाद्या अधिकाऱ्याचं नाव असेल आणि त्या प्रकरणाच्या तपासाला वेळ लागत असेल तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत रुजू केले जाते असं कायद्यात नमूद आहे. नियमबाह्य कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याची जोरदार चर्चा सुरु होती.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना पदावरुन हटवण्याबाबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येणार नाही. गृहमंत्री बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.