आम्ही भाजपच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही – नवाब मलिक

'सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करू,' असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. याला उत्तर देताना मंत्री नवाब मलिक यांनी “भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई – “तुम्ही सत्तेचा कितीही दुरुपयोग करा भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही.” अशा शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे. भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना धमक्या दिल्या असून याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे.

    भाजपला जे करायचे आहे ते करावे. “कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा ही काय आमच्यासाठी नवीन गोष्ट नाही.” असेही नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.

    मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर महाड न्यायालयाने रात्री उशीरा त्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर राणेंची चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी ‘करारा जवाब मिलेगा’ अशा आशयाचं ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला होता.

    राणेंच्या ट्वीटनंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला व त्यांच्या चौकशीची मागणी केली.

    अनिल परब यांनी राणेंना चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना भाग पाडलं. दलालांमार्फत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केला. या सर्व प्रकरणाची सरकारने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत शी मागणी त्यांनी केली होती.

    एकढचं नही तर, ‘सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करू,’ अशी धमकीच शेलार यांनी महाराष्ट्र सरकारला दिली होती. याला उत्तर देताना मंत्री नवाब मलिक यांनी “भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.