आज दसरा मेळावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडें भाषणात काय बोलणार?

आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमध्ये पार पडणार आहे. आपापल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

    मुंबई : आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमध्ये पार पडणार आहे. आपापल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

    दरम्यान दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होणार आहे. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

    उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतील

    आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत सैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे नेते असतील असं म्हटलं जातंय. तसेच यातील सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे केंद्रीय यंत्रणा. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणा राज्यातल्या विविध नेत्यावर कारवाई सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. अशातच शिवसेना महाविकास आघाडीसोबत जरी असली तरी सावरकरांना भारतरत्न देण्याची त्यांची आजही आग्रही मागणी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचं सावरकर प्रेम अजुनही कमी झालेलं नाही. त्यामुळं नव्यानं सावरकरामुळे सुरु झालेल्या वादावर उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतील.

    ठाकरे राज्यपालांचाही समाचार घेण्याची शक्यता

    लखीमपूर प्रकरणात केंद्र सरकारचा चिडीचूपपणा, महाराष्ट्र बंद शेतकरीविरोधी धोरणं यावर उद्धव ठाकरे आवर्जुन बोलणार राज्यातल्या शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोना काळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून जे राजकारण रंगलं त्यावरून उद्धव ठाकरे जाहिरपणे बऱ्याचवेळा बोलले, पण आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमिवर राज्यात काय काय केलं? हे सांगायला ठाकरे विसरणार नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच किस्से आहेत. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घ्यायला विसरणार नाहीत.

    पंकजा मुंडें काय बोलणार?

    भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे.

    पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण सर्वजण कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. या दोन वर्षात मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते. त्यामुळं आपण कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

    पंकजा मुंडे म्हणाल्या की, इथून आतापर्यंत आपण अनेक संकल्प केले आहेत. मुंडे साहेबांनी अनेक संकल्प केले होते, आपण ते तडीसही नेले. असेच संकल्प करण्यासाठी आपण दरवर्षी तिथं येतो. ती एक उर्जा आहे, एक शक्ति आहे, आपला अभिमान आहे. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे. आपण घरातून निघताना आपली शिदोरी घेऊन निघा. पाणी सोबत ठेवा. कार्यक्रमस्थळी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा. कोरोनाचं संकट टळलं असलं तरी आपण काळजी घ्यायची आहे. आपण मास्क लावूनच यायचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यामुळं कुणाला होऊ नये याची काळजी घ्यावी.