नितीन गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरेंचे प्रत्युत्तर; काय म्हणाले मुख्यमंत्री, जाणून घ्या!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नितीनजी तुम्ही गोष्टी तर खूप प्रेमाने करतात; मात्र पत्र कठोर लिहितात. तुमचं आणि आमचं नातं थोडसं वेगळं आहे. आपल्याला कल्पना आहे की, शिवसेनाप्रमुखांची जी शिकवण आहे जी आपण सुद्धा घेतलेली आहे की ......

    नागपूर (Nagpur) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत आज महामेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क उदघाटन सोहळा पार पडला. 1.6 किलोमीटर लांब या मार्गाच्या उदघाटनाअंतर्गत झिरो माईल स्टेशन आणि कस्तुरचंद पार्क स्टेशन व फ्रिडम पार्कचे देखील उदघाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रावर भाष्य करत त्यांना आपला शब्दसुद्धा दिला आहे.

    नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नितीनजी तुम्ही गोष्टी तर खूप प्रेमाने करतात; मात्र पत्र कठोर लिहितात. तुमचं आणि आमचं नातं थोडसं वेगळं आहे. आपल्याला कल्पना आहे की, शिवसेनाप्रमुखांची जी शिकवण आहे जी आपण सुद्धा घेतलेली आहे की जनतेसोबत कधीही गद्दारी करायची नाही, विश्वासघात करायचा नाही. मी आपल्याला ग्वाही देतो कोणत्याही प्रकारे जनतेच्या विश्वासाच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही.

    नितीन गडकरींच्या पत्रात काय?
    नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा देणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अलिकडेच पाठविले आहे.

    गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे. हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे या बद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

    हे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल.ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

    गडकरी पत्रात काय म्हटले?
    अकोला व नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (12 किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

    या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

    पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते, अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.