नाना तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यावरही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

फडणवीस यांनी या आधी तीन ट्विट करून सरकारडे पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती. राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे.

    नागपूर (Nagpur) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Ex Police Commissioner) परमबीर सिंग (Parambir Singh) यांना परदेशात जाण्यासाठी केंद्राने तर मदत केली नाही ना? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोचक टीका केली आहे. नाना पटोले (Nana Patole) काहीही बोलत असतात. नाना तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यावरही बोलू शकतात, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. नाना पटोले काहीही बोलतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची गरज नाही. ते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात, असा खोचक फडणवीसांनी लगावला.

    उद्यापासून पूरग्रस्त भागाची पाहणी
    मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही ते म्हणाले.

    काय म्हणाले होते पटोले?
    दरम्यान, मुंबईत गांधी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी मोदी सरकारवर आरोप केला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, परमवीर सिंह यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमवीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केला होता.

    कोकणात अजूनही मदत नाही
    दरम्यान, फडणवीस यांनी या आधी तीन ट्विट करून सरकारडे पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती. राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, असं ते म्हणाले होते.