पक्षीय भूमिका, विचारधारा भिन्न असल्यातरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार यांनी हे संस्कार आपल्या कृतीतून महाराष्ट्रात रुजवले. त्याच संस्काराच्या शिदोरीवर आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत. तोच खरा महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे, त्याला अहंकाराचा, खुनशीपणाचा वास नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर भिन्न विचार सरणीच्या डाव्या विचारांच्या ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांच्या कार्यालयात जावून आशीर्वाद घेणारे, शेती, उद्योग आणि विकासाच्या प्रश्नांवर पवार साहेबांचा सल्ला खुलेपणाने स्वीकारणारे नितीन गडकरी हे मला वेगळे वाटत नाहीत. त्यांच्यातही तो महाराष्ट्राच्या मातीतला संस्काराचा गुण आहे.
आपल्या धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वांच्या आदरस्थानी असलेले केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. गडकरी हे केवळ राजकारणी, समाजकारणी नाहीत, तर ते उत्तम उद्योजक, प्रयोगशील शेतकरी आहेत. सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करून त्याला कृतीची पुरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात गडकरींचा अव्वल क्रमांक लागतो. कोरोना संकटाच्या काळात कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने शक्य ती मदत करत आहेत, त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो.
पक्षीय भूमिका, विचारधारा भिन्न असल्यातरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार यांनी हे संस्कार आपल्या कृतीतून महाराष्ट्रात रुजवले. त्याच संस्काराच्या शिदोरीवर आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत. तोच खरा महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे, त्याला अहंकाराचा, खुनशीपणाचा वास नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर भिन्न विचार सरणीच्या डाव्या विचारांच्या ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांच्या कार्यालयात जावून आशीर्वाद घेणारे, शेती, उद्योग आणि विकासाच्या प्रश्नांवर पवार साहेबांचा सल्ला खुलेपणाने स्वीकारणारे नितीन गडकरी हे मला वेगळे वाटत नाहीत. त्यांच्यातही तो महाराष्ट्राच्या मातीतला संस्काराचा गुण आहे.
गडकरी हे आता जरी केंद्रात काम करत असले तरी राज्याच्या विधिमंडळात सहकारी म्हणून अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. त्यातही सत्तेत आणि विरोधी पक्षात अशा दोन्ही भूमिकांतून आम्ही कायमच एकमेकांसमोर उभे होतो. त्यांच्या आणि आमच्या पक्षाच्या वैचारिक भूमिका भिन्न होत्या. मात्र सत्तेत असताना अहंकार आणि विरोधी पक्षात असताना एकारलेपणा, आक्रस्ताळेपणा मला त्यांच्यात कधीही जाणवला नाही. त्यामुळे कायम एकमेकांविरोधात असूनही आमच्यात कायमच स्नेह राहिला आहे. गडकरींविषयी माझ्यासारखी अनेकांची हीच भावना असेल.
कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. या संकट काळात कोणीही, कोणत्याही प्रकारचे राजकारण करता कामा नये. मदतीच्या कामांचा देखावा करू नये. अनावश्यक प्रसिद्धी केली नाही पाहिजे. प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आपल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षाच्या बैठकीत रोखठोकपणे सांगणारे सन्माननीय गडकरी त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांचा हा रोखठोक सल्ला राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे, दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा आहे.
नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. विकासाची दृष्टी असणारे आणि त्या दृष्टीला कृतीची जोड देणारे नेते आहेत. त्यामुळेच देशात त्यांच्या रस्ते विकास व महामार्ग खात्याच्या कामांचा उंचावलेला आलेख ठळकपणे दिसतो. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रसिद्धी करण्याची त्यांना गरज लागत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात काम करत असतानाही गडकरी यांचे महाराष्ट्राच्या विकासकामांवरही बारकाईने लक्ष आहे, हे या निमित्ताने विशेषत्वाने नमूद करावे लागेल. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असले तरी दिल्लीतील त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक विषयाला ते नेहमीच सकारात्मकतेने, संवेदनशीलपणे प्रतिसाद देतात.
त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ असलेला एक संवेदनशील नेता दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांची नेहमीच मदत होते, हे नम्रपणे नमूद करावे लागेल. त्यांच्या या सहकार्याच्या, संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच महाराष्ट्राप्रमाणेच देशातील अनेक राज्यात ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या वागण्या, बोलण्यात विदर्भाच्या मातीचा रांगडा बाज जरी असला तरी ते संवेदशील, मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळेच केवळ विदर्भातच नाहीतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी, आपलेपणा वाटतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही ऐकारलेपणा, अहंकार, आत्मप्रौढी दिसत नाही, हेच त्यांचे वैशिष्ट्यं म्हणावे लागेल.
नव्या तंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आचरण करणारे नितीन गडकरी हे आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर दिल्लीत महाराष्ट्राच्या कीर्तीचा सुगंध पसरवत आहेत. राज्याच्या प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. नव्या कल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून देशाची सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य