कुंर्झे – ब्राम्हणगावमधील देहर्जे नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी

विक्रमगड : कंचाड ते पाचमाड या मुख्य मार्गावर कुंर्झे – ब्राम्हणगाव(kurnjhe-bramhan gav) या गावांच्या मधून वाहत असलेल्या देहर्जे नदीवरील पूल(bridge) अतिशय लहान व अरुंद असल्याने पावसाळ्यात अनेक दिवस हा पूल पाण्याखाली जातो. अनेकदा चार ते पाच दिवस या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंददेखील होते. अनेक वर्षांपासून नागरिक तसेच विद्यार्थी यांची होणारी हेळसांड शासनाच्या लक्षात येऊन या जागी नवीन पूल का उभारला जात नाही, असा संतप्त सवाल येथील लोकांनी उपस्थित केला आहे.
कंचाड ते पाचमाड या मार्गावर खरेतर अनेक गाव – पाडे असून हा मार्ग येथील लोकांच्या प्रवासात महत्वाची भूमिका बजावतो. कुंर्झे – ब्राम्हणगाव या गावांच्या सीमेवरून देहर्जे ही नदी वाहत असून या नदीवर एक पूल असून हा पूल उंचीने इतका लहान आहे की ज्यावरून अगदी किरकोळ पावसाने देखील पाणी येऊन अनेक दिवस वाहतूक पूर्ण ठप्प होते.
या परिसरातील कुर्झे, कडीपाडा यासह अनेक गावातील विद्यार्थ्याना शाळेत जाण्याचा प्रश्न उभा राहत असून त्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय नोकरदार व अन्य प्रवाश्यांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात लोकांना विक्रमगड मार्गे अतिशय फेऱ्यात प्रवास करावा लागतो तर अनेकदा तोही मार्ग ठप्प होतो.
या परिसरातील ही समस्या लक्षात घेऊन तात्काळ शासनाने या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करावी अशी लोकांनी मागणी केली आहे. रस्ता जिल्हा परिषदकडे असला तरी येथील पुलाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत असून १२० मीटर अंतराच्या या पुलासाठी ६ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे शाखा अभियंता के.डी. यादव यांनी सांगितले.
पुलाबाबत अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने या ठिकाणी पूल उभारणीसाठी निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाला तशा सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र यानंतर शासनाचे नेमके घोडे कुठे अडकले आहे याबाबत कुणालाही कल्पना नाही.