भवानी मातेचा पलंग सोहळा प्रथमच खंडीत

तुळजाभवानी मातेच्या जयघोषात भाविक भक्तांच्या डोक्यांवर तर कधी हातावर उचलत पायी प्रवासाची १२ व्या शतकापासूनची परंपरा असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचा पलंग सोहळा कोरोनाच्या संकटामुळे मागील ८०० वर्षात प्रथमच खंडीत होणार आहे.

    मागील ८०० वर्षात प्रथमच खंडीत होणार
    जुन्नर : तुळजाभवानी मातेच्या जयघोषात भाविक भक्तांच्या डोक्यांवर तर कधी हातावर उचलत पायी प्रवासाची १२ व्या शतकापासूनची परंपरा असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचा पलंग सोहळा कोरोनाच्या संकटामुळे (Corona crisis) मागील ८०० वर्षात प्रथमच खंडीत होणार आहे. एवढ्या प्रदीर्घ काळाचा पलंगाचा हा प्रवास अनेक संकटे झेलत अव्ह्या यतपणे सुरू राहिल्याचे पुर्वज सांगतात तर यंदा मात्र कोरोनाच्या संकटाने पलंगाच्या अखंडीत चाललेल्या परंपरेला बाधा पोहचली आहे.

    जुन्नरहुन तुळजापूर कडे प्रस्थान झाले. पलंगाचेभाद्रपद पंचमीला जुन्नर येथे घोडेगाव येथून आगमन होते. जुन्नर येथील दहा दिवसाचे मुक्कामानंतर देवीचा पलंग पायी प्रवासाने तुळजापूरला रवाना होतो. पलंग निर्मितीची प्रक्रिया घोडेगाव ( ता.आंबेगाव ) येथुन सुरू होते. पुर्वी घोडेगाव येथे वास्तव्यास असणारे लाकडावर कोरीव काम करणारे ठाकुर कुटुंबिय पूर्वापार पणे पलंग तयार करत. कातीव काम व देवीच्या हिरव्या बांगड्या व भंडाऱ्याचे प्रतीक म्हणून हिरव्या व पिवळ्या नैसर्गिक रंगाच्या लेपणातून चार पाय, छत व सहा कळस अशा रचनेत पलंग बनविला जातो. सध्या हे कुटुंब पुणे येथे रहावयास असल्याने पलंगाचे कातीव सुटे भाग घोडेगाव येथे पाठविले जातात. त्यानंतर घोडेगाव येथील भागवत कुटुंबाकडे पलंग जोडण्याचा मान आहे. घोडेगाव येथील तेली समाजाकडे पलंगाची जबाबदारी असते. जुन्नर येथे तेली समाजाच्या सभागृहात पलंगावर तुळजाभवानी देवीची गादीची स्थापना करण्यात येते. घोडेगाव ते तुळजापूर या पायी प्रवास मार्गात फक्त जुन्नर येथे १० दिवस पलंगाचा मुक्काम जुन्नर येथे असतो आहे. राजमाता जिजाऊ पलंगाच्या दर्शनासाठी येत असल्याचे इतिहासात संदर्भ मिळतात.

    पलंग तुळजापूरला नेण्याचे मानकरी अहमदनगर (नालेगाव) येथील पलंगे कुटुंबियांकडे आहे. जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, पारनेर, नगर, भिंगार, जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगामार्गे दस-याच्या आदल्यादिवशी तुळजापुरापर्यंत पंलंगांचा प्रवास होतो. तुळजापूर येथे पंलंगांचे स्वागतासाठी जिल्हाधिकाऱ्यानी येण्याची प्रथा आहे. तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवातचे सांगतेप्रसंगी दसऱ्याला देवीची मुर्ती सीमोल्लंघनाला नेली जाते व परत आलेनंतर मुर्ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जुन्या पलंगावर निद्रिस्त ठेवली जाते.पौर्णिमेच्या दिवशी जुना पलंग होमात टाकला जातो व जुन्नर वरून गेलेल्या नवीन पलंग मंदिरात ठेवला जातो.