‘भामा आसखेड’च्या सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी ३५ कोटी भरणार

राज्य सरकारने भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी कोटा आरक्षणास १३ नोव्हेंबर २०१८ रोजी मान्यता दिली. त्यानुसार, पुणे पाटबंधारे खात्याने सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी २०८ कोटी ६५ लाख रुपये भरण्यास महापालिकेस सांगितले होते. पुनर्वसन खर्चापोटी ३० कोटी ८७ लाख महापालिकेने दिले आहेत. तो खर्च वगळून १७७ कोटी ७८ लाख रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. ही रक्कम महापालिकेस एक रकमी भरणे बंधनकारक करण्याऐवजी सन २०२०-२१ पासून पाच वर्षात टप्प्याटप्प्याने समान वार्षिक हप्त्यात स्विकारावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापैकी ३५ कोटी ५५ लाख ६० हजारांचा पहिला हप्ता महापालिकेकडून  पाटबंधारे विभागाला देण्यात येणार आहे.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून बिगर सिंचन ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी साठा राज्य सरकारने आरक्षित केला आहे. पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनर्स्थापना खर्च २०८ कोटी ६५ लाख रुपये महापालिकेला पाटबंधारे विभागाला द्यावे लागणार आहेत. त्यातील ३५ कोटी ५५ लाख ६० हजारांचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.

    शहराच्या लोकसंख्यावाढीचा वेग आणि सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून राज्य सरकारकडे आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली होती. शहरातील अनेक भागात पाण्याची ओरड आहे. चिखलीचऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी या समाविष्ट भागासह इतर ठिकाणी नियमीत पाणी पुरवठ्याची गरज आहे.

    राज्य सरकारने भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी कोटा आरक्षणास १३ नोव्हेंबर २०१८ रोजी मान्यता दिली. त्यानुसार, पुणे पाटबंधारे खात्याने सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी २०८ कोटी ६५ लाख रुपये भरण्यास महापालिकेस सांगितले होते. पुनर्वसन खर्चापोटी ३० कोटी ८७ लाख महापालिकेने दिले आहेत. तो खर्च वगळून १७७ कोटी ७८ लाख रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. ही रक्कम महापालिकेस एक रकमी भरणे बंधनकारक करण्याऐवजी सन २०२०-२१ पासून पाच वर्षात टप्प्याटप्प्याने समान वार्षिक हप्त्यात स्विकारावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापैकी ३५ कोटी ५५ लाख ६० हजारांचा पहिला हप्ता महापालिकेकडून  पाटबंधारे विभागाला देण्यात येणार आहे.

    भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे. जलवाहिनी टाकण्याचे आणि चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हे पाणी शहरवासीयांना पुरविता येणार आहे. शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे.

    आंद्रासाठी २० कोटी
    आंद्रा धरणातून ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाणी पिंपरी – चिंचवड महापालिकेसाठी आरक्षित आहे. त्यासाठी सिंचन पुनर्स्थापना खर्च १०० कोटी ८० लाख २५ हजार ८५६ आहे. हा खर्च महापालिका पाच टप्प्यात देणार आहे. सन २०१८-१९ साठी पहिला हप्ता २० कोटी १६ लाख आणि सन २०१९-२० साठी दुसरा हप्ता २० कोटी १६ लाख रूपये देण्यात आला आहे. आता सन २०२०-२१ साठीचे तिसऱ्या हप्त्याचे २० कोटी १६ लाख रूपये पुणे पाटबंधारे विभागाकडे भरण्यात येणार आहेत.
    ———————-